Filled Under: , , ,

सिंहगड


पूर्वी हा किल्ला आदिलशाहीत होता. दादोजी कोंडदेव हे आदिलशहाकडून सुभेदार म्हणून नेमले होते. पुढे .. १६४७ मध्ये दादोजी कोंडदेवांच्या निधनानंतर कोंडाण्यावरील किल्लेदार सिद्दी अंबर याला लाच देऊन शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात आणला आणि गडावर आपले लष्करी केंद्र बनवले. पुढे .. १६४९ मध्ये शहाजी राजांच्या यांच्या सुटकेसाठी शिवाजी राजांनी हा किल्ला परत आदिलशहाला दिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये कोंढाणापण होता. मोगलांतर्फे उदेभान राठोड हा कोंढाण्याचा अधिकारी होता. हा मुळचा राजपूत पण नंतर मुसलमान झाला.
सिंहगडचे मूळ नाव कोंढाणा होते आणि शिवाजी महाराजांच्या काळात त्यांचे विश्वासू सरदार आणि बालमित्र तानाजी मालुसरे आणि त्यांच्या मावळच्या सैन्याने हा किल्ला एका चढाई दरम्यान जिंकला. या लढाईत तानाजींना वीरमरण आले आणि जीवनाचे बलिदान देऊन हा किल्ला जिंकल्यामुळे शिवाजी महाराजांनी "गड आला पण सिंह गेला" हे वाक्य उच्चारले. पुढे त्यांनी गडाचे नाव सिंहगड असे बदलले. सिंहगड हा मुख्यतः प्रसिध्द आहे तो तानाजी मालूसरे यांच्या बलिदानामुळे.
सिंहगडाची लढाई:-
या युध्दाबाबत सभासद बखरीत खालील उल्लेख आढळतो:
तानाजी मालुसरा म्हणून हजारी मवळियांचा होता. त्याने कबूल केले की, 'कोंडाणा आपण घेतो', असे कबूल करून वस्त्रे, विडे घेऊन गडाचे यत्नास ५०० माणूस घेऊन गडाखाली गेला. आणि दोघे मावळे बरे, मर्दाने निवडून रात्री गडाच्या कड्यावरून चढवले. गडावर उदेभान रजपूत होता. त्यास कळले की, गनिमाचे लोक आले. ही खबर कळून कुल रजपूत कंबरकस्ता होऊन, हाती तोहा बार घेऊन, हिलाल (मशाल), चंद्रज्योती लावून बाराशे माणूस तोफाची तिरंदाज, बरचीवाले, चालोन आले. तेव्हा मावळे लोकांनी फौजेवर रजपुतांचे चालून घेतले. मोठे युद्ध एक प्रहर झाले. पाचशे रजपूत ठार जाले. उदेभान किल्लेदार खाशा त्याशी तानाजी मालुसरा यांशी गाठ पडली. दोघे मोठे योध्दे, महशूर, एक एकावर पडले. तानाजीचे डाव्या हाताची ढाल तुटली. दुसरी ढाल समयास आली नाही. मग तानाजीने आपले डावे हाताची ढाल करून त्याजवर वोढ घेऊन, दोघे महरागास पेटले. दोघे ठार झाले. मग सुर्याजी मालूसरा (तानाजीचा भाऊ), याने हिंमत धरून, कुल लोक सावरुन उरले राजपूत मारिले. किल्ला काबीज केला.
शिवाजी महाराजांना गड जिंकल्याची पण तानाजी पडल्याची बातमी मिळाली तेव्हा ते म्हणाले, 'एक गड घेतला, परंतु एक गड गेला'.
माघ वद्य नवमी दि. फेब्रुवारी १६७२ च्या रात्री हे युद्ध झाले.
गडावरील ठिकाणे:-
दारूचे कोठार : दरवाजातून आत आल्यावर उजवीकडे जी दगडी इमारत दिसते तेच दारू कोठार. दि. ११ सप्टेंबर १७५१ मध्ये या कोठारावर वीज पडली. ह्या अपघातात गडावरील त्यावेळच्या फडणीसांचे घर उध्वस्त होऊन घरातील सर्व माणसे मरण पावली.
टिळक बंगला : रामलाल नंदराम नाईक यांच्याकडून खरेदी केलेल्या जागेवरच्या ह्या बंगल्यात बाळ गंगाधर टिळकयेत असत. १९१५ साली महात्मा गांधी लोकमान्य टिळक यांची भेट याच बंगल्यात झाली.
कोंढाणेश्र्वर : हे मंदिर शंकराचे असून ते यादवांचे कुलदैवत होते. आत एक पिंडी सांब असणारे हे मंदिर यादवकालीन आहे.
श्री अमृतेश्र्वर भैरव मंदिर' : कोंढाणेश्र्वराच्या मंदिरावरून थोडे पुढे गेले की डावीकडे हे अमृतेश्र्वराचे प्राचीन मंदिरलागते. भैरव हे कोळ्यांचे दैवत आहे. यादवांच्या आधी ह्या गडावर कोळ्यांची वस्ती होती. मंदिरात भैरव भैरवी अशा दोन मुरत्या दिसतात. भैरवाच्या हातात राक्षसाचे मुंडके आहे.
देवटाके : तानाजी स्मारकाच्या मागून डाव्या हाताच्या छोटा तलावाच्या बाजूने डावीकडे गेल्यावर हे प्रसिद्ध असे देवटाके लागते. या टाक्याचा उपयोग पिण्याचे पाणी म्हणून होत असे आजही होतो. महात्मा गांधी जेव्हा पुण्यासयेत तेव्हा मुद्दाम ह्या टाक्याचे पाणी मागवत असत.
कल्याण दरवाजा : गडाच्या पश्चिमेस हा दरवाजा आहे. कोंढणपूरवरून पायथ्याच्या कल्याण गावातून वर आल्यासह्या दरवाजातून आपला प्रवेश होतो. हे एकामागोमाग असे दोन दरवाजे आहेत. यापैकी वरच्या दरवाज्याच्या दोन्हीकडील बुरुजांच्या भिंतीत अर्धवट बाहेर आलेला हत्ती माहूत अशी दगडी शिल्पे होती.श्रीशालीवाहन शके १६७२ कारकीर्द श्रीमंत बाळाजी बाजीराव पंडित प्रधान असा शिलालेख आढळतो.
उदेभानाचे स्मारक : दरवाजाच्या मागच्या बाजूस वर असलेल्या टेकडीवर यावे. येथे जो चौकोनी दगड आहे तेच उदेभान राठोडचे स्मारकचिन्ह म्हणून ओळखले जाते. मोगलांतर्फे उदेभान हा सिंहगडचा अधिकारी होता.झुंजारबुरूज : झुंजारबुरूज हे सिंहगडचे दक्षिण टोक होय. उदयभानूच्या स्मारकापुढून समोरची टेकडी उतरून याबुरुजावर येता येते. येथून समोरच टोपीसारखा राजगड, त्याच्याच उजवीकडे तोरणा हे गड दिसतात तर खाली पानशेतचेखोरे दिसते. पूर्वेकडे लांबवर पुरंदर दिसतो.
डोणगिरीचा उर्फ तानाजी कडा : झुंजारबुरूजावरून मागे येऊन तटाच्या भिंतीच्या बाजूने पायवाटेने तानाजीच्या कडाकडे जाता येते. हा कडा गडाच्या पश्चिमेस आहे.येथूनच तानाजी मावळ्यांसह वर चढला.
राजाराम स्मारक : राजस्थानी पद्धतीची रंगीत देवळासारखी जी घुमटी दिसते तीच छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी.मोगली फौजेला सतत ११ वर्षे टक्कर देणा-या राजाराम महाराजांचे वयाच्या अवघ्या ३०व्या वर्षी शनिवार दि. मार्चइ..१७०० या दिवशी सिंहगडावर निधन झाले. पेशव्यांतर्फे या स्मारकाची उत्तम व्यवस्था ठेवली जायची.
तानाजीचे स्मारक : अमृतेश्र्वराच्या मागच्या बाजूने वर गेल्यावर डाव्या बाजूस सुप्रसिध्द तानाजीचे स्मारक दिसते. ‘तानाजी स्मारक समितीच्यावतीने हे बांधण्यात आले आहे. माघ नवमी दि. फेब्रुवारी १६७२ या दिवशी झालेल्या लढाईततानाजी मारला गेला. दरवर्षी माघ नवमीस येथे मंडळातर्फे तानाजीचा स्मृतिदिन साजरा केला जातो.
गडावर जाण्याच्या वाटा
सिंहगड हा किल्ला पुण्यापासून २० किलोमीटर अंतरावर आहे. स्वारगेट बसस्थानकापासून सारसबाग किंवा नेहरु मैदानाकडून जाणारा हा रस्ता अंदाजे ३५ कि.मी. आहे.
मार्ग
स्वारगेट - आनंदनगर - वडगांव - खडकवासला - सिंहगड पायथा.
स्वारगेट पासून ५० ते ५६ क्रमांकाच्या बस या मार्गावर धावतात. शिवाय, सहा आसनी किंवा खासगी वाहनाने सिंहगडाच्या पायथ्यापर्यंत जाता येते. ज्यांना गडावर चालत जायचे नसेल त्यांच्यासाठी पायथ्यापासून गडावर जाण्यासाठी खासगी वाहने साधारण दर ३०-६० मिनिटांनी उपलब्ध असतात.

0 comments:

Post a Comment