Filled Under: , ,

लोहगड


लोणावळ्यानजीकच्या मळवली स्टेशन नजीकच दुर्गांची एक जोडगोळी उभी आहे.त्यातील मुख्य दुर्ग आहे लोहगड आणि त्याला बळकट आणि संरक्षित करण्यासाठी शेजारीच बांधला आहे विसापूर अथवा संबळगड.लोहगडावरून पवनेच्या धरणाचे सुंदर दृश्य दिसते.पलीकडेच तिकोना उर्फ वितंडगड नावाचा अजून एक किल्ला आहे.तुंग उर्फ कठीणगडहि येथेच आहे.अंदरमावळ आणि पवनमावळ यांच्यामधील पर्वतराजीत हा दुर्ग वसलेला आहे.

गडाचा इतिहास:-
लोहगड किल्ला हा अति मजबूत, बुलंद आणि दुर्जेय आहे. किल्ल्याच्या निर्मिती जवळ असणारी भाजे आणि बेडसे ही बौद्धकालीन लेणी ज्या काळी निर्माण झाली, त्याही पूर्वी म्हणजेच सत्तावीशसे वर्षांपूर्वी झालेली असावी असे अनुमान निघते. सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव या सर्व राजवटी या किल्ल्याने पाहिल्या... १४८९ मध्ये मलिक अहमंदने निजामशाहीची स्थापना केली आणि अनेक किल्ले जिंकून घेतले. त्यापैकीच लोहगड हा एक. .. १५६४ मध्ये अहमदनगरचा सातवा राजा दुसरा बुर्हाण निजाम या किल्ल्यावर कैदेत होता. .. १६३० मध्ये किल्ला आदिलशाहीत आला. १६५७ मध्ये शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी परिसर जिंकून घेतला आणि लोहगडविसापूर हा सर्व परिसर सुद्धा स्वराज्यात सामील करून घेतला. .. १६६५ मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहात हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन केला गेला. पुढे १३ मे १६७० मध्ये मराठ्यांनी किल्ला परत जिंकला. पहिल्या सुरत लूटेच्या वेळेस आणलेली संपत्ती नेताजी पालकरने लोहगडावर आणून ठेवली होती. .. १७१३ मध्ये शाहूमहाराजांनी कृपावंत होऊन लोहगड कान्होजी आंग्रे यांस दिला. १७२० मध्ये आंगर्यांकडून तो पेशव्यांकडे आला. १७७० मध्ये नाना फडणवीसांचा सरदार जावजी बोंबले याने तो आपल्या ताब्यात घेतला. नानांनी पुढे धोंडोपंत नित्सुरे यांच्याकडे किल्ल्याचा कारभार सोपवला... १७८९ मध्ये नानांनी किल्ल्याचे बांधकाम आणखीन मजबूत करून घेतले. किल्ल्यात नानांनी सोळा कान असलेली एक बाव बांधली तिच्या बाजूस एक शिलालेख कोरला, त्याचा अर्थ असा-शके १७११ मध्ये बाळाजी जनार्दन भानूनाना फडणवीस यांनी ही बाव धोंडो बल्लाळ नित्सुरे यांच्या देखरेखीखाली बाजीचट याचेकडून बांधिवली. नानांनी आपले सर्व द्रव्य नित्सुर्यांचे निगराणीत लोहगडावर आणले. १८०० मध्ये नित्सुर्यांचा कैलासवास झाला. १८०२ मध्ये त्यांच्या पत्नी किल्ल्यावर येऊन राहिल्या. १८०३ मध्ये किल्ला इंग्रजांनी घेतला. पण नंतर दुसर्या बाजीरावाने तो पुन्हा जिंकला. मार्च १८१८ ला जनरल प्रॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने सर्व प्रथम विसापूर जिंकला. ज्या दिवशी विसापूर इंग्रजांनी घेतला त्याच्या दुसर्याच दिवशी मराठे लोहगड सोडून गेले.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे:-
गडावर चढतांना आपल्याला सलग चार प्रवेशद्वारांमधून आणि सर्पाकार मार्गावरून जावे लागते. सर्वप्रथम
. गणेश दरवाजाः- ह्याच्याच डाव्याउजव्या बुरुजाखाली सावळे कुटुंबाचा नरबळी देण्यात आला होता आणि त्याच्या बदल्यात त्यांच्या वंशजांना लोहगडवाडीचीपाटिलकी देण्यात आली होती.येथे आतील बाजूस शिलालेख आहेत.
. नारायण दरवाजाः- हा दरवाजा नाना फडणीसांनी बांधला. येथे एक भुयार आहे, जिथे भात नाचणी साठवून ठेवण्यात येई.
. हनुमान दरवाजाः- हा सर्वात प्राचीन दरवाजा आहे.
. महादरवाजाः- हा गडाचा मुख्य दरवाजा आहे. यावर हनुमानाची मूर्ती कोरली आहे. ह्या दरवाज्यांचे काम नाना फडणीसांनी नोव्हेंबर १७९० ते ११ जून १७९४ या कालावधीत केले.महादरवाज्यातून आत शिरताच एक दर्गा लागतो. दर्ग्याच्या शेजारी सदर लोहारखानाचे भग्र अवशेष आढळतात. याच दर्ग्याच्या बाहेर बांधकामाचा चुना बनविण्याचा घाणा आहे.उजवीकडे ध्वजस्तंभ आहे.याच्या जवळच एक तोफ काही हौश दुर्गप्रेमींनी सिंमेटच्या चौथ-यात बसवलेली आहे.अशीच एक तोफ तुटलेल्या अवस्थेत लक्ष्मीकोठीच्या समोर पडलेली आहे. ध्वजस्तंभाच्या उजवीकडे चालत गेल्यास लक्ष्मी कोठी आढळते. या कोठीत राहाण्याची सोय होते.या कोठीत अनेक खोल्या आढळतात.दर्ग्याच्या पुढे थोडे उजवीकडे गेल्यास थोडा उंचवटयाचा भाग आहे , जिथे एक सुंदर शिवमंदिर आढळते.पुढे सरळ चालत गेल्यावर एक छोटेसे तळे आहे.हे तळ अष्टकोनी आहे. त्याच्याच बाजूला पिण्याच्या पाण्याचे टाके देखील आहे.ही गडावरील पिण्याच्या पाण्याची एकमेव सोय आहे. तिथून पुढे पंधरा ते वीस मिनिटे चालत गेल्यास एक मोठे तळे आढळते.नाना फडणवीसांनी या तळ्याची बांधणी केली आहे.हे तळं सोळाकोनी आहे.मोठा तळ्याच्या पुढे विंचुकाटाकडे जातांना वाडांचे काही अवशेष दिसतात. लक्ष्मी कोठीच्या पश्चिमेस विंचूकाटा आहे. या विंचूकाटास बघून आपल्याला आठवण येते ती म्हणजे राजगडाच्या संजीवनी माचीची. पंधराशे मीटर लांब आणि तीस मीटर रुंद अशी ही डोंगराची सोंड आहे. विंचुकाटयावर जाण्यासाठी एक टप्पा उतरून पलीकडे जावे लागते . गडावरून पाहिले असता हा भाग विंचवाच्या नांगीसारखा दिसतो,म्हणून यांस विंचूकाटा म्हणतात.या भागात पाण्याची उत्तम सोय आढळते. गडाच्या आजुबाजूचा परिसर न्याहाळण्यासाठी या विंचूकाटा चा उपयोग होत असावा. या गडावरून येतांना भाजे गावातील भाजे लेण्या आवर्जून पाहव्यात. लोहगडावरच्या इमारती पडलेल्या आहेत.नाना फडणीस यांनी बांधलेली एक विहीर गडावर आहे.नानांचा शिलालेखही त्या विहिरीवर आहे.१०० लोक झोपू शकतील एवढी एक गुहासुद्धा गडावर आहे.लोहगडाचे उत्तरेकडचे टोक निमुळते होत गेले आहे.त्याला थोडी तटबंदी आहे.या माचीचे नाव आहे विंचूकाटा टोक.गडाच्या माचीच्या खाली दाट जंगल आहे.
लोहगडाचा उपदुर्ग असलेल्या वीसपुरावर मोठी सपाटी आहे.तशीच मोठी दगडी तटबंदी आहे.प्राचीन शिलालेखही आहेत.डोंगराच्या पोटात भाज्याची लेणी आहेत.ती दोन हजार वर्षापूर्वी कोरलेली आहेत.
लोहगडाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे कड्याच्या टोकावर बांधलेली चिरेबंदी वाट.अशी रेखीव वाट फार कमी दुर्गांवर पहावयास मिळते.लोहगडवाडी पार केली कि हि सर्पाकार वाट सुरु होते.एकदा का कोणी या वाटेवर पाय टाकला कि मग तो माणूस वर येईस्तो पहारेकर्यांच्या नजरेआड जात नाही.तो व्यवस्थित हेरला जातो.वाटेवर वेगवेगळे बुरुज आहेत.त्यावरून बाहेरून येणार्या माणसावर नजर ठेवली जाते.वाटेवर गणेश दरवाजा,दुसरा नारायण,तसरा हनुमान,आणि चौथा महादरवाजा,असे चार दरवाजे आहेत.हनुमान दरवाजा जुना आहे.इतर तीन दरवाजे आणि एक उत्तम रेखीव जिना नाना फडणीस यांनी बांधून घेतले आहेत.दुसर्या आणि तिसर्या दरवाज्यांच्या मधील भागात जकीरा करण्याची भुयारे आहेत.
लोहगडाचा हा द्वारसमूह आगळावेगळा आहे आणि विचारांती बांधलेला आहे.गडावर गेल्यावर वरच्या बुरजावरून हा सर्व मार्ग न्याहाळता येतो.कड्याच्या टोकावरचे हे बांधकाम खूप सुंदर आहे.
गडावर जाण्याच्या वाटा:-
लोहगडावर जाण्यासाठी तीन वाटा आहेत.
 ) पूण्यावरून अथवा मुंबईवरून येतांना लोणावळ्याच्या पुढे असणा-या मळवली स्थानकावर उतरावे.तेथून एक्स्प्रेस हायवे पार करून भाजे गावातून थेट लोहगडला जाणरी वाट पकडावी.वाट मोठी आणि प्रशस्त आहे.तिथून दीड तासांच्या चालीनंतरगायमुखखिंडीत येऊन पोहचतो. खिंडीच्या अलिकडेच एक गाव आहे त्याचे नाव लोहगडवाडी.खिंडीतून उजवीकडे वळले म्हणजे लोहगडास ास पोहचतो आणि डावीकडे वळले म्हणजे विसापूर किल्ल्यावर पोहचतो.या मार्गे लोहगडावर प्रवेश करतांना चार दरवाजे लागतात. ) लोणावळ्याहून दुचाकी अथवा चारचाकी वाहनाने थेट लोहगडावाडी पर्यंत जाता येते.पवना धरणाकडे जाणा-या रस्त्याने थोडे पुढे गेल्यावर डावीकडे एक रस्ता लागतो तेथून ते किं मी अंतरावर लोहगडावाडी आहे.उभा चढ आणि अतिशय धोकादायक वळणे आहेत.साधारण अर्धा तासाचा प्रवास आहे.मात्र येथे एसटी महामंडळाची सोय नाही.स्वतःचे वाहन असल्यास उत्तम अथवा लोणवळ्यातून ट्रॅक्सने जाता येते मात्र ट्रॅक्सभाडे १००० रु आहेत.
 ) काळे कॉलनी ही पवना धरणाजवळ वसलेली आहे.तेथून लोहगड आणि विसापूर मधील गायमुख खिंड परिसर व्यवस्थित दिसतो.पवना धरणाच्या खालून एक रस्ता गायमुख खिंडीच्या डावीकडील टेक टेकडीवर जातो तेथून एक मळलेलीपायवाटआपणासलोहगडावाडीत घेऊन जाते.या टकडीवर अग्रवाल नावाच्या इसमाचा बंगला आहे.या वाटेने किल्ल्यावर जाण्यास तास लागतात.


0 comments:

Post a Comment